बळीराजा

पाणी म्हणजे जीवन

water-is-life पाण्याला जीवन असे नाव आहे. ते एकदम सार्थ आहे. कारण सर्व सजीवांचे जीवनच पाण्यावरच अवलंबून आहे. मानवाची पाण्याची गरज मानव जातीच्या निर्मितीपासूनची आहे. मानवी शरीरालाच फक्त नव्हे तर मानवाच्या उत्क्रांतीसाठी , भरभरटीसाठी व प्रगतीसाठी पाणी आवश्यकच होते. कोणतीही गोष्ट करायची असल्यास पाण्याची आवशक्यता भासते. पाण्याचा सर्वाधिक महत्वाचा वापर हा पिण्यासाठी होतो. निरोगी आरोग्याच्या दृष्टीने पिण्याचे पाणी स्वच्छ आणि शुध्द असावयास हवे. शुध्द पाणी म्हणजे, रंगहीन, गंधहीन, रूचिहीन, रोगाणू आणि अन्य विषाकत द्रव्यांचा अभाव असलेले. जीवनावश्यक घटकांच्या बाबतीत परिपूर्ण असणारे पारदर्शक पाणी होय. असे स्थितीचे पाणी मिळणे कठीणच आहे, परंतु या स्थितीच्या जवळपास गुणवत्ता असणारे पाणी आपण टिकवून ठेवू शकलो तरी मानवी आरोग्याच्या दृष्टीने योग्य आहे. पाणी हे सर्वसमावेशक द्रावण आहे. ते तीनही भौतिक स्थितीत जसे की द्रव, घन आणि वायू रूपात पृथ्वीवर अस्तित्वात आहे. निसर्गात रासायनिकदृष्ट्या शुध्द पाणी सापडत नाही. पावसाचे पाणी शुध्द समजले जात असले तरी ते जमिनीवर पोहोचेपर्यंत त्यामध्ये हवेतील अनेकविध घटक मिसळतात. त्यानंतर जमिनीशी संपर्क आल्यावर जमिनीवरील सेंद्रीय आणि असेंद्रीय पदार्थ त्यामध्ये मिसळल्या जातात.पाण्याच्या या नैसर्गिक वहनामुळे जलसाठ्यातील पाणी पिण्यायोग्य मानकांमध्ये बसत नाही. म्हृणून पिण्यासाठी हे पाणी वापरण्याआधी त्यावर योग्य ते उपचार किंवा प्रक्रिया करणे आवश्यक ठरते. त्यामुळे त्यातील अतिरिक्त सेंद्रीय आणि असेंद्रीय घटक भौतिक, रासायनिक आणि जैविक पध्दतीने

water-is-life वेगळे करून पाणी पिण्यायोग्य आदर्शाप्रत आणले जाते. ही उपचार पध्दती अत्यंत आवश्यक आहे कारण डोळ्यांना रंगहीन आणि पारदर्शक दिसणारे पाणी पिण्यायोग्य असेलच असे नाही.  प्रक्रियेनंतर विविध चाचण्या घेवून, पाण्याचे परिक्षण करूनच ते पिण्यायोग्य आहे किंवा नाही हे ठरविता येते. पाणीपुरवठा करतांना तेथील लोकसंख्येचा विचार करणे अनिवार्य आहे. कोणत्याही गावात/शहरात दरमाणशी पाणीपुरवठा हा तेथील एकूण लोकसंख्येवर तसेच तेथे असलेल्या विविध उद्योगधंदे आणि सोयीसुविधांना पूरक असतो. त्यामुळे महानगरे, शहरे येथे अधिक पाणीपुरवठा तर खेडेगावामध्ये त्यामानाने कमी पाणीपुरवठा होतो. या पार्श्वभूमिवर शहरांमध्ये प्लॅट, फ्लश पध्दती यामुळे पाण्याचा अनाठायी गैरवापर होतो तर खेड्यांमध्ये पिण्यासारख्या मुलभूत गरजेसाठीही पाणी मिळत नाही असे चित्र दिसते. तसेच पिण्याचे पाणी वाहून नेणाऱ्या पाईपलाईन्स या आतापर्यंत लोखंडी धातूच्या वापरत. अजूनही जून्या नळजोडणीसाठी त्याचाच वापर केलेला आहे. वर्षानुवर्षाच्या वापरामुळे त्या गंजतात, झिजतात आणि पातळ बनतात. काही ठिकाणी नळजोडणी पक्की झाली नसेल किंवा खंडलेली असेल तर जमिनीतील आजूबाजूचे घटक यात मिसळल्या जातात आणि पाणी दूषित होते. बऱ्याचदा सांडपाण्याची पाईपलाईन आणि पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ही एकमेकाजवळून जात असते. अशावेळेस जर त्या कुठे खंडीत होऊन त्यातील पाणी एकमेकांत मिसळले तर गंभीर आजारास निमंत्रण मिळेल.

water-is-life अद्यापही आपल्याकडे सांडपाण्यावर योग्य प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट लावण्याची पध्दत पूर्णत: अवलंबिण्यात येत नाही. यामुळे सांडपाणी मानवी वसाहतींजवळूनच वाहण्याचे दृश्य सगळीकडेच दिसते. सुरक्षित नगररचना ही पध्दत भारतात रूढ झालेली नाही. निश्चित अशी सुनियोजित नगररचना नसल्या कारणाने वेगवेगळ्या पाईपलाईन्सचे जाळे जमिनीखाली पसरलेले आहे. मुंबईसारख्या शहरात तर हे जाळे इतके गुंतागुंतीचे आहे की भविष्यात एखादे संकट आल्यास मानवीजीवन अक्षरश: ठप्प पडेल असे तज्ञांचे मत आहे. पाणीपुरवठ्याची नळजोडणी हे एक विशिष्ट शास्त्रशुध्द तंत्र आहे. त्यानुसार त्या केलेल्या असल्यास भविष्यात उद्भवणाऱ्या अडचणींवर ठोस उपाय निधू शकतात. परंतु बऱ्याचदा अशा तांत्रिक बाबींकडे दुर्लक्ष होते आणि मग त्याचे पर्यवसन जलवाहिनी फुटणे, नळजोडणी गंजणे, झिजणे व पाण्यात अपायकारक घटक मिसळणे इ. बाबी घडतात. एकूणच पाणीपुरवठा करण्याची पध्दत ही अतिशय महत्वाची असून त्याच्या तांत्रिक बाबींकडे दुर्लक्ष केल्यास पाण्याचा प्रचंड अपव्यय आणि प्रदूषण होण्याची सक्यता असते. जलसाठे हे भौगोलिकदृष्ट्या सखल भागात आणि जलशुध्दीकरण केंद्र हे उंच भागावर असेल तर पाणी उपशासाठीच भरपूर वीज खर्च होते, पर्यायाने जलशुध्दीकरणावरचा खर्च वाढतो. शुध्दीकरण केलेले पाणी आपण शिळे समजून ओतून देतो हा तर पाण्याच्या संदर्भात मोठा गुन्हाच आहे. कारण धरणे, नदी, तलाव इ. तून पाणी एका ठिकाणी आणून त्यावर शुद्दीकरणाची प्रक्रिया करणे त्यानंतर ते शहरभर वितरित करणे यामागे प्रचंड आर्थिक आणि तांत्रिक गुंतवणूक असते. यामुळे पिण्याच्या पाण्याचे नियोजन होणे गरजेचे आहे.

– अमोल मारुती निरगुडे