गजानन दिगंबर माडगूळकर : ( १ ऑक्टोबर १९१९ – १४ डिसेंबर १९९७ )

gadimaविख्यात मराठी कवी व पटकथा-संवाद-लेखक. जन्म शेटेफळ ह्या गावचा. शिक्षण आटपाडी, कुंडल आणि औंध येथे. गणित विषयामुळे मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण होऊ शकले नाहीत. पुढे घरच्या गरिबीमुळे चरितार्थासाठी चित्रपटव्यवसायात आले. लहानपणापासून लिहिण्याची, नकला करण्याची आवड होती. तिचा येथे उपयोग झाला. ‘हंस पिक्चर्स’ ह्या चित्रसंस्थेच्या, मा.विनायक दिग्दर्शित ‘ब्रम्हचारी’ (१९३८) ह्या गाजलेल्या चित्रपटात काही छोटया भूमिका करून माडगूळकरांनी आपल्या चित्रपटक्षेत्रातील कारकीर्दीचा आरंभ केला. सुप्रसिध्द साहित्यिक वि. स. खांडेकर ह्यांचे लेखनिक म्हणूनही त्यांनी काही काळ काम केले. त्या निमित्ताने खांडेकरांच्या संग्रहातली पुस्तके त्यांना वाचायलास मिळाली; खूप लिहावेसे वाटू लागले; त्यांच्या कवितालेखनालाही वेग आला. ‘नवयुग चित्रपट लि.’ ह्या चित्रसंस्थेत के. नारायण काळे ह्यांच्या हाताखाली साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करण्याची संधी माडगूळकरांना मिळाली, तेव्हा चित्रकथेची चित्रणप्रत कशी तयार करतात, हे त्यांना अगदी जवळून पहावयास मिळाले. तसेच आचार्य अत्रे ह्यांच्या सोप्या पण प्रासादिक गीतरचनेचा आदर्श त्यांच्या समोर राहिला. पुढे नवसंह पिक्चर्सच्या ‘भक्त दामाजी’ (१९४२) आणि ‘पहिला पाळणा’ (१९४२) ह्या चित्रपटांनी गीते लिहिण्याची संधी मिळाली.

पुढे राजकमल पिक्चर्सच्या ‘लोकशाहीर रामजोशी’ (१९४७) ह्या चित्रपटाची कथा-संवाद आणि गीते त्यांनी लिहिली; त्यात एक भूमिकाही केली. ह्या चित्रपटाला फार मोठी लोकप्रियता लाभली; त्यानंतर कवी आणि लेखक अशा दोन्ही नात्यांनी माडगूळकर हे मराठी चित्रसृष्टीचा एक भक्कम आधार बनले. गीतकार, कथासंवादकार आणि अभिनेते म्हणून दीडशेहून अधिक मराठी आणि कथासंवादकार म्हणून पंधरा हिंदी चित्रपटांसाठी त्यांनी काम केले. त्यांनी मराठी चित्रपटांसाठी लिहिलेली गीते ‘चैत्रबन’ (१९६२) ह्या नावाने संग्रहीत आहेत, तसेच त्यांनी लिहिलेल्या काही मराठी चित्रकथाही पुस्तकरूपाने प्रसिध्द झालेल्या आहेत. (तीन चित्रकथा, १९६३). ‘युध्दाच्या सावल्या’ (प्रयोग, १९४४) ह्या नावाने एक नाटक त्यांनी लिहिले होते; तथापि ते फारसे यशस्वी झाले नाही.

त्यांच्या काही उल्लेखनीय पुस्तके म्हणजे कविता – जोगिया (१९५६), चार संगीतिका (१९५६), काव्यकथा (१९६२), गीत रामायण (१९५७), गीत गोपाळ (१९६७), गीत सौभद्र (१९६८ ),

कथासंग्रह – कृष्णाची करंगळी (१९६२), तुपाचा नंदादीप (१९६६), चंदनी उदबत्ती (१९६७).

कादंबरी – आकाशाची फळे (१९६०). आत्मचरित्र – ‘मंतरलेले दिवस’ (१९६२) आणि ‘वाटेवरल्या सावल्या’ (१९८१).

माडगूळकरांच्या कवितेवर ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम आदी संतांच्या कवितेप्रमाणेच पंडिती आणि शाहिरी कवितेचेही सखोल संस्कार झाले होते, ह्याचा प्रत्यय त्यांनी चित्रपटांसाठी लिहिलेल्या सुंदर घाटाच्या, सोप्या परंतु प्रभावी गीतांतून येतो. त्यांच्या कवितेतील अस्सल मराठमोळेपणामागेही हेच संस्कार उभे असल्याचे दिसते. त्याचप्रमाणे लोकगीतांच्या लोभस लयतालांनी त्यांची गीते नटलेली असत. उत्तम समरगीते आणि बालगीतेही त्यांनी लिहिली. मराठी रसिकांनी माडगूळकरांच्या काव्यरचनेला मन:पूर्वक प्रतिसाद दिला आणि त्यांच्या ‘गीत रामायणा’ने तर कीर्तीचा कळस गाठला. त्यांना ‘महाराष्ट्र-वाल्मीकी’ ही सन्माननीय पदवी लोकांनी स्वयंस्फूर्तीने दिली. गीत रामायणाच्या गायनाचे शेकडो कार्यक्रम झाले व अजूनही होता आहेत. अन्य भारतीय भाषांत त्याचे अनुवादही झाले.

त्यांच्या चित्रकथा वैविध्यपूर्ण असून त्यांचे संवाद सोपे पण प्रत्ययकारी आहेत. चित्रपटतंत्राची त्यांची अत्यंत सूक्ष्म जाण त्यांतून लक्षात येते. त्यांनी लिहिलेल्या आणि विशेष गाजलेल्या चित्रपटांत ‘पुढचं पाऊल’ ( पटकथा, संवाद, गीते १९५० ), ‘बाळा जो जो रे’ (१९५१), ‘लाखाची गोष्ट’ (१९५२), ‘पेडगावचे शहाणे’ (१९५२), ‘ऊन पाऊस’ (१९५४), ‘मी तुळस तुझ्या अंगणी’ (१९५५), ‘जगाच्या पाठीवर’ (१९६०), ‘संथ वाहते कृष्णामाई’ (१९६७) ह्यांचा समावेश होतो. (कथा, पटकथा, संवाद गीते त्यांपैकी सर्व वा काही).
‘तुफान और दिया’ (१९५६), ‘दो ऑंखे बारह हाथ’ (१९५७), ‘गूंज उठी शहनाई’ (१९५९) हे त्यांनी लिहिलेले उल्लेखनीय हिंदी चित्रपट.

माडगूळकर हे उत्तम चरित्र अभिनेते होते. ‘पुढचं पाऊल’, ‘लाखाची गोष्ट’, ‘पेडगावचे शहाणे’, ‘व-हाडी आणि वाजंत्री’ (१९७३) ह्या चित्रपटांत त्यांनी केलेल्या भूमिका संस्मरणीय ठरलेल्या आहेत. त्याच्या जोगिया, मंतरलेले दिवस, चैत्रबन इ. अनेक पुस्तकांना महाराष्ट्र शासनाची पारितोषिके मिळाली. भारत सरकारने पद्मश्री देऊन (१९६९) त्यांचा सन्मान केला.

१९७३ मध्ये यवतमाळ येथे भरलेल्या मराठी साहित्यसंमेलनाचे अध्यक्षपद त्यांना देण्यात आले होते. महाराष्ट्र राज्याच्या विधानपरिषदेचे ते काही काळ नियुक्त सदस्य होते, तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचेही ते सदस्य होते. गदिमा प्रतिष्ठानही काढण्यात आले.