आईने तान्हेपणी रस्त्यावर सोडल्यापासून नारायण सुर्वेच्या आयुष्याची सुरूवात झाली. अपार कष्ट, खस्ता, लढे ह्यातून घडत ते मराठीतील एक श्रेष्ठ कवी म्हणून मान्यता पावले आहेत. रुद्रा व्हिडीयोने आणलेला नारायण सुर्वे ह्यांच्यावरचा चित्रपट त्यांच्या आयुष्यातील काही महत्वाच्या घटना आणि कवितांवर आधारित आहे.सुर्वेंच्या अनेक कवितांची भाषा ही मुंबईची विविध बोली भाषा आहे. खाटीक, शरीरविक्रय करणार्या स्त्रिया, पौगंडावस्थेतील मुले, खलाशी, गिरणीकामगार अशा अनेकांच्या शब्दांतील तेज सुर्वेव्या कवितेच्या भिंगाने एकवटले जाते तेव्हा त्याची धग जाणवते. सुर्वेंच्या
शब्दांतून हे सारे सजीव होतात आणि अनेकदा काही ओळीत मरूनही जातात. पण त्यांचे सशक्त आवाज त्यांच्या लकबींसकट वाचकांच्या कानात घुमत राहतात. त्यांच्या दरिद्री भासणार्या आयुष्यात कवितेच्या शब्दशक्तीचे आणि लयींचे संपन्न साठे दडलेले असतात. सुर्वेंच्या 'मुक्त' वाटणार्या रचनेचे रहस्य त्यांच्या बोलक्या शब्दांच्या धूर्त पकडीत आहे त्यामुळेच त्यांची कविता एकाच वेळी मुक्त आणि लयबध्द असते. तिच्या बहूश्रुत शब्दसंपत्तीत, उच्चारशैलींच्या वैविध्यात आणि विशाल भावविश्वात तिचे मराठीतील जनजीवनाचा अविभाज्य घटक झालेल्या सतर्कवितेशी नाते दिसून येते.दिग्दर्शकाची भूमिका
ह्या चित्रपटात सुर्वेंच्या कवितेतील विविध लयी नव्याने शोधताना, तिच्या शब्दांपलीकडच्या अनेकविध ध्वनींना ऐकवण्याचा, माणसांनी
गच्च भरलेल्या जगाचा पोत डोळयासमोर आणण्याचा प्रयत्न आहे. गिरण्यांचे भोंगे, निर्मनुष्य पदपथावरील घुमणारे पावलांचे आवाज,
श्रमांनी भेगा पडलेले हातपाय, रापलेले चेहरे, घोडयांचे फुरफुरणे, घामाने भिजलेले कपडे, नालांचे आकार घेणार्या लोखंडी कांबी,
गोदीतल्या अवाढव्य क्रेन्स, जहाजे, खळाळलेल्या लाटा, भिंतींचे उडालेले रंग, वापराने आणि घामाने आकार बदलत जाणार्या वस्तू,
अवजारे, परस्परांच्या लयीत घुसलेली माणसे आणि यंत्रे, शरीरविक्रय आंबलेली शरीरे, निश्वास आणि हास्ये, सुर्वेच्या 'विद्यापीठा'ची
व्याखाने.

