गणपतीची कहाणी

ganpati-kahani ऐका परमेश्वरा गणेशा, तुमची कहाणी, निर्मळ मळे, उदकाचे तळें, बेलाचा वृक्ष, सुवर्णाचीं कमळें, विनायकाचीं देवळें रावळें. मनाचा गणेश मनीं वसावा. हा वसा कधीं घ्यावा? श्रावण्या चौथीं घ्यावा. माही चौथीं संपूर्ण करावा. संपूर्णाला काय करावं? पशापायलीचं पीठ कांडाव. अठरा लाडू करावे. सहा देवाला द्यावे, सहा ब्राह्मणाला द्यावे, सहाचं सहकुटुंबी भोजन करावं. अल्प दान, महापुण्य. असा गणराज मनीं ध्यायीजे, मनी पाविजे, चिंत्त लाभिजे, मनकामना निर्विघ्र कार्यसिध्दि किजे. ही साठां उत्तरांची कहाणी, पांचां उत्तरी सुफळ सपूर्ण.

गोपद्मांची कहाणी

ऐका गोपद्मांनो, तुमची कहाणी. स्वर्गलोकीं इंद्रसभा, चंद्रसभा, कौरवसभा, पांडवसभा इत्यादि पाची सभा बसल्या आहेत. ताशे मर्फे वाजाताहेत, रंभा नाचताहेत, तोंच तुंबुर्‍याच्या तारा तुटल्या. मृदुंगांच्या मे-या फुटल्या. असे झाल्यावर सभेचा हुकूम झाला, “करा रे हांकारा, पिटा रे डांगोरा. गांवांत कोणी वाणवशावाचून असेल, त्याच्या पाठीचा तीन बोटं कंकर काढा, तंबुर्‍याला तारा लावा, कीर्तन चालू करा, रंभा नाचत्या करा.” असा हुकूम झाल्यावर कृष्णदेव मनांत भ्याले. माझी बहीण सुभद्रा हिनं काही वाणवसा केला नसेल. तेव्हा ते उठले, तिच्याकडे जाऊन चौकशी केली. तिनं काही वाणवसा केला नाहीं. नंतर कृष्णांनीं तिला वसा सांगितला, ” सुभद्रे सुभद्रे, आखाड्या दशमीपासून तीस दिवस तीन गोपद्मं देवाच्या द्वारी काढावीत, तितकीच ब्राह्मणाचे द्वारी, पिंपळाचे पारी, तळ्याचे पाळी व गाईच्या गोठ्यांत काढून पूजा करावी.

हा वसा कार्तिक्या दशमीस संपूर्ण करावा. याप्रमाणं पाच वर्ष करावं. उद्यापनाचे वेळीं कुवारणीस जेवायला बोलवावी. पहिल्या वर्षी विडा द्यावा, दुस-या वर्षी चुडा भरावा, तिस-या वर्षी केळ्यांचा फणा द्यावा, चौथ्या वर्षी उसाची मोळी द्यावी, पाचव्या वर्षी चोळी परकर नेसवून आपल्या वशाचं उद्यापन करावं.” असं सांगून कृष्ण पूर्व ठिकाणी येऊन बसले. नंतर लागलीच सुभद्रेनं सांगितल्याप्रमाणं केलं. पुढं सभेत कळलं. सुभद्रा वाणवशाशिवाय आहे असं समजल्यावर तिकडे दूत जाऊन पहातात, तो तिनं वसा वसला आहे. पुढं येता येता गावाबाहेर एक हत्तीण वाणवशाशिवाय त्यांना दिसली. ती दक्षिणेस पाय, उत्तरेस डोकं करून निजलेली होती. तेव्हां तिच्या पाठीचा कंकर काढून नेला. नंतर तंबो-याच्या तारा जोडल्या, मृदुंगाच्या भे-या वाजत्या केल्या. तशाच रंभा नाचत्या केल्या. जसं ह्या व्रताच्या योगानं सुभद्रेवरचं संकट टळलं, तसं तुमचं आमचं टळो. ही साठां उत्तरांची कहाणी पांचां उत्तरीं सुफळ संपूर्ण.

तात्पर्य – प्रत्यकाने नेमधर्मानें वागावें म्हणजे सुख मिळतें.