डिजिटल विश्वातील तणाव

digital world मोबाईल सोबत नसताना तुम्ही अस्वस्थ होतात का? आपल्या घरात काय चाललंय यापेक्षा ऑनलाइन विश्वात काय चाललंय याबद्दल तुम्हाला अधिक रस वाटतो का? सकाळी उठल्यावर तुम्ही सर्वप्रथम फोन हातात घेऊन त्याचा मोबईल डेटा चालू करतात का?ऑनलाइन बोलणे तुम्हाला आनंदाचा आभास देते का?कुणी तुमच्याशी ऑनलाइन बोलत असताना पलीकडून पटकन reply आला नाही किंवा कोणी ऑनलाइन भेटले नाही तर तुम्हाला वाईट किंवा अस्वस्थ वाटते का?आभासी जगातील तुमचा ‘मी’ हा वास्तवातल्या ‘मी’ वर कुरघोडी करतो का?तुमचे शेवटचे प्रत्यक्ष-face to face (facebook वर नव्हे)चांगले बोलणे कुणाशी झाले हे आठवण्यासाठी मेंदूला ताण द्यावा लागतो का? यापैकी एकही प्रश्नाचे उत्तर हो असेल तर तुम्ही डिजिटल जगाचे ‘गुलाम’ आहात आणि ऑनलाइन व्यसनाचे बळी आहात.

तंत्रज्ञान आपले आयुष्य सोपे बनवते; पण आपण तंत्रज्ञानाच्या अतिवापराने तणावाला निमंत्रण देतो आणि दुखणे विकत घेतो. मला किती ‘Likes’ मिळाले?एखादा ‘सेल्फी’ घेऊन आपण कुठे आहे हे इतरांना दाखवू, त्याने/तिने मला ‘Like’ का केले नाही? तिचे/त्याचे किती ‘Follower’ आहेत, Friend आहेत? आणि माझे? हे आताचे प्रश्न, त्यातून येणारा ताण तंत्रज्ञानाच्या अतिवापराने निर्माण झाले आहे. ऑनलाइन ताणतणावातून सुटका कशी करायची यासाठी काही उपाय बघूया.

Face to Face-प्रत्यक्ष संवाद:

एक छोटे काम करा. तुमच्या जिवलग मित्र/मैत्रिणीला फोन करा आणि चाय पे चर्चा करत भेट घ्या. तुम्हाला चांगले वाटेल. एकमेकांना न भेटता, ऑनलाइन chatting वर विश्वास ठेवत तुम्ही जर असा विचार कराल की आपण ‘connected’ आहोत सर्वांशी. तर सावधान! तुम्ही भ्रमात आहात. तुम्हाला त्यांची जेव्हा गरज असेल तेव्हा तुम्हाला जोरदार धक्का बसू शकतो आणि तो पचवणेही कठीण जाईल. जेव्हा तुम्ही समोरासमोर बोलतात तेव्हा व्यक्तीच्या भावनांचा अंदाज चांगल्याप्रकारे घेता येतो. न बोलताही बऱ्याचदा डोळे, चेहरा, हावभाव यातून मनस्थितीचा वेध घेता येतो. ऑनलाइन chatting हा आभासी जगातील एक आभास असतो. संशोधकांनी सुद्धा मान्य केलंय की आभासी ऑनलाइन संवाद प्रत्यक्ष संवादाची जागा घेऊच शकत नाही. तुमच्या वैयक्तिक संवादासाठी सोशल मीडियावर अवलंबून राहण्यापेक्षा प्रत्यक्ष भेटा आणि व्यक्त व्हा.

स्मार्टफोन पासून दिवसातील काही काळ दूर रहा

काहींसाठी ही प्रचंड अवघड गोष्ट असू शकते. पण तुमचा स्मार्टफोन तुम्हाला ‘स्मार्ट’ बनवत नाही तर तुमचा आत्मविश्वास, उर्मी तुम्हाला स्मार्ट बनवते. स्मार्टफोनमुळे आपली निर्णयक्षमता कमी होत नाहीये ना याकडे लक्ष असू द्या. सतत २४*७ तास सोबत असणारा मोबईल विक्षिप्त वागणुकीबरोबर सायबर सिकनेस, फेसबुक डिप्रेशन इ. ला जन्म देतो.

आभासी जगातून स्वतःला वास्तवात आणा

digital world मोबाईलच्या अतिवापरामुळे एका जागी बसूनही थकल्यासारखे वाटते. कारण तुमचे डोके सतत कशाततरी गुंतलेले असते. मोबईलचे व्यसन लागलेला व्यक्ती वास्तवातील समस्येला भिडताना सैरभैर होण्याची शक्यता असते. वास्तव जगाशी संवाद तुटल्याने ‘मी-माझे’ याच जगात ते वावरतात, जिथे ते सतत त्यांचे आनंद, दु:ख, प्रतिक्रिया ऑनलाइन मांडत असतात.

संशोधकांच्या मते, जर तुम्ही दिवसातील ७ तासांपेक्षा अधिक वेळ स्मार्टफोन, ipad, कॉम्पुटरवर व्यतीत करत असाल तर सामाजिक भावनांचे जाळे असलेल्या मेंदूच्या भागाची हानी होऊ शकते. यातूनच मग तुमच्या आकलनशक्तीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. या थरापर्यंत जाण्यापेक्षा वास्तवात आणि या निसर्गाचा आनंद घ्या.

एकावेळी एकच

जगातील मानसशास्त्रज्ञांचे एकमत आहे की, एकावेळी अनेक कामे – Multitasking मानवासाठी योग्य नाही. मानवाच्या काही नैसर्गिक मर्यादा आहेत. काही मानसशास्त्रज्ञांचे तर असे मत आहे की सतत ऑनलाइन राहणे आणि तंत्रज्ञानावरील वाढते अवलंबित्व मेंदूतील रासायनिक अभिक्रिया बदलवते. त्यामुळे आपण चिडखोर, अधीर, हेकेखोर होतो.

नव्या युगाचे नवे ‘डिजिटल’ आजार

तुमच्या मोबईलची battery कमी होते किंवा बंद पडते तेव्हा तुम्हाला खूप अस्वस्थ वाटत असेल तर तुम्ही नोमोफोबिया ग्रस्त आहात.

जर तुमच्या खऱ्या किंवा कल्पित आजाराच्या लक्षणांसाठी तुम्ही इंटरनेटवर ‘सर्च’ करत असाल तर तुम्ही Cyberchondria चे बळी आहात.

मोबाईल रिंगटोन वाजत नसतानाही तुम्हाला तसा वारंवार भास होत असल्यास Phantom Vibration Syndrome चे तुम्ही शिकार आहात.

जर तुम्हाला इतरांना ऑनलाइन छळायला मजा येत असेल तर तुम्ही Online Disinhibitation Effect ने ग्रस्त आहात.

जर तुम्ही तुमची प्रत्येक गोष्ट, update ऑनलाइन मांडत असाल तर तुम्ही Digital Goldfish च्या जाळ्यात अडकला आहात.

तंत्रज्ञान, नवी साधने वापरुच नये असे नाही पण त्यावर अतिविसंबून राहणे धोक्याचे! सतत गुगल वापरणे आणि माहिती मिळवणे म्हणजे मोठे कर्तृत्व किंवा हुशारी नाही. माहिती आणि ज्ञान यातील फरक समजला तरी धन्य! माहितीच्या प्रचंड महासागरातील लाटेवर स्वार होऊन गटांगळ्या खाण्यापेक्षा त्याचा विधायक वापर करून प्रगतीकडे वाटचाल करणेच योग्य.

संदर्भ : Times Of India

– विशाखा एस. ठाकरे