MarathiWorld - HomeServices
About Us About Marathi World Suggest a site Feedback Contact Site Map

कथा बिनाका गीतमालाची - रेडीओ सिलोनचा बहर

रेडिओ आणि टीव्ही ही सध्या सामान्य माणसाची मनोरंजनाची दोन प्रमुख साधने. त्यामध्ये टीव्ही हा सध्या जास्तच लोकप्रिय झाला आहे. टीव्हीवर वेगवेगळे कार्यक्रम पाहायला मिळतात. ओघानेच ते कार्यक्रम कोणी पाहू देत अगर न पाहू देत, पण हे कार्यक्रम २४ तास सुरू असतात.

गेल्या काही वर्षात काही कार्यक्रमांनी, काही मालिकांनी प्रचंड लोकप्रियता मिळवली, परंतु या कार्यक्रमाची ही लोकप्रियता सातत्याने टिकत नाही. त्या लोकप्रियतेवर चढउतार होतही राहातात. दीर्घकाळ एका कार्यक्रमाने लोकप्रियता मिळवली, असे क्वचित घडले आहे.

हा आजचा जो टीव्हीचा काळ आहे तसाच एक रेडिओचा जमाना होता. तो आजही आहे, पण टीव्हीच्या तुलनेत कमी आहे. जेव्हा रेडिओचा जमाना होता तेव्हा रेडिओवरूनही विविध कार्यक्रम लोकांना ऐकविले जात होते. त्यामध्ये गाण्यांचे कार्यक्रम, नभोनाटय, कथाकथन, विनोदी प्रसंगाचे कथन, माहिती देणारे कार्यक्रम अशी खूप विविधता असे आणि त्यासाठीसुध्दा श्रोते आपली पसंत ठरवत असत, आपली मते देत असत. त्यानुसार त्या त्या कार्यक्रमांची लोकप्रियता ठरत असे. आज टीव्हीवर ज्याप्रमाणे विविध चॅनल्स आहेत तितक्या मोठया प्रमाणात रेडिओवरील केंद्रांची संख्या नव्हती, पण जी केंद्रे होती त्यामध्ये ऑल इंडिया रेडिओ, पुणे आकाशवाणी केंद्र, मुंबई आकाशवाणी केंद्र, विविध भारती अशा अनेक भारतीय केंद्रांबरोबर एका परदेशातील केंद्रांचे नाव श्रोत्यांच्या ओठी असे बी.बी.सी. अर्थात ब्रिटीश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन हे केंद्र खात्रीलायक बातम्यासाठी लोकप्रिय होते व आहे. तथापि त्या व्यतिरिक्त ज्या परदेशीय आकाशवाणी केंद्राने भारतात प्रचंड लोकप्रियता मिळविली होती व आजही आहे ते म्हणजे रेडिओ सिलोन अर्थात श्रीलंका ब्रॉडकॉस्टिंग कॉर्पोरेशन!

तसा श्रीलंकेचा व आपला संबंध साडेपाच हजार वर्षांपूर्वीच्या रामायणापासूनचा, पण या कलीयुगात श्रीलंका भारतातील चित्रपटप्रेमींना भावली ती तेथील रेडिओ केंद्रातून ऐकवल्या जाणा-या हिंदी चित्रपट गीतांमुळे! हिंदी चित्रपट गीतांमधील विविधता आणि वेगवेगळया कार्यक्रमाद्वारे ती विविध प्रकारची गीते श्रोत्यांना ऐकवणे याबाबतीत रेडिओ सिलोनने रेडिओच्या जमान्यात निर्माण केलेले स्थान आज टीव्हीच्या जमान्यातही टिकून आहे, म्हणून तर नुकतेच अमरावती येथील सोसायटी ऑफ इंडियन रेकॉर्ड कलेक्टर्स आणि अमरावती रेडिओ श्रोता संघ यांच्यावतीने अमरावती येथे 'अखिल भारतीय रेडिओ सिलोन श्रोता संमेलन' आयोजित करण्यात आले होते. प्रचंड श्रोत्यांच्या उपस्थितीत संपन्नही झाले.

रेडिओ सिलोनवरील चित्रपटविषयक गीतांचे कार्यक्रम लोकप्रिय होऊ लागले तेव्हा १९६७ मध्ये विविध भारतीवरून विज्ञापन सेवा सुरू झाली. त्यामधून विविध चित्रपटगीते लोकांपर्यत पोहोचू लागली. रेडिओ सिलोनने हा मार्ग आधीच अवलंबिलेला असल्यामुळे त्यावरून विविध कार्यक्रम प्रसारित होत होते आणि त्यामध्ये 'आपही के गीत', 'ओवस्टीन फुलवारी', 'लक्स के सितारे,' सॅनफोराइज्डके मेहमान,' 'एकही फिल्मसे' असे विविध कार्यक्रम होते. त्याच्या पसंतीचे पत्रे लोक पाठवत असत. (जसे आज एसएमएस पाठवले जातात तसे) आणि त्या पत्रांवरून त्या कार्यक्रमाची लोकप्रियता कळून येत असे. आजच्या टीव्हीच्या कार्यक्रमाच्या लोकप्रियतेत जशी चढउतार होते तसेच तेव्हाही चालत असे. मात्र रेडिओ सिलोनच्या हिंदी चित्रपटविषयक गीतांच्या बिनाका गीतमालाने मात्र सातत्याने लोकप्रियताच मिळविली. ही लोकप्रियता व या कार्यक्रमाचे टिकून राहाणे एक-दोन वर्षांचे नव्हे, तर चक्क ४१ वर्षांचे होते. आठवडयातून एकदाच विशिष्ट दिवशी ठराविक वेळेला बिनाका गीतमाला हा कार्यक्रम प्रसारित होत असे आणि श्रोते त्या दिवसाची, त्या वेळेची आठवडाभर चातकासारखी वाट बघत असत. त्याचीच कहाणी आपण बघणार आहोत, ऐकणार आहोत, वाचणार आहोत.

पद्माकर पाठक,
सातारा