मी २००६ बोलतोय
मी तुमच्यासाठी मागील घटनांचा आढावा घेणार आहे. हे करतांना आंतरराष्ट्रीय राजकारणात, समाजकारणात, भांडवलदारांच्या राज्यात, स्पर्धात्मक जगात  चमकलेल्या भारतीयांचा उल्लेख करतांना थोडेसे इतर संदर्भसुध्दा देईन.......तुमच्या भाषेत ऑल इन वन पॅकेज.
आपण आरंभ करूया समाजकारणापासून २००६ चे समाजकारण मध्यमवर्गीय तसेच उच्च-मध्यमवर्गीय समाजातील लोकांनी गाजवले. मग खटला  जेसिकालालचा असो वा प्रियदर्शनी मट्टोचा या दोन्ही खटल्यात आरोपींना शिक्षा देण्यासाठी समाजातील जागरूक लोकांचा फार मोठा हातभार लागला होता. मिडीयाला सुध्दा समाजातील याच लोकांची दखल घ्यायला लागली. आरक्षणाच्या मुद्दयावरून नुसते विद्यार्थीच नाही तर समाजातील जागरूक नागरिकही पेटून उठले परंतु शेतक-यांचे प्रश्न, आत्महत्या याकडे मात्र समाजातील घटकांनी दुर्लक्षच केलं. भारतीय क्रिकेट संघाची कामगिरी असो, भारताने अमेरिकेशी केलेला अणूकरार असो, वन्देमातरम संबंधी परिसंवाद असो वा ब्रॅड पिट, ऍ़जलिना जोली यांचा विषय असो, समाजाने या प्रत्येक विषयावर आपली मते ठामपणे मांडली त्यात त्यांना एस.एम.एस आणि दूरचित्रवाणी कंपन्यांनी चांगलीच साथ दिली. २००६ सालात समाजातील घटकांनी खरोखरीच समाजकारण केले असे म्हणायला हरकत नाही.
आता थोड राजकारणावर बोलू. सत्तारूढ काँग्रेस पक्षाने परत गरीबी हटाओ या जुन्या नात्यावर, घोषणेवर नव्याने विचार करतोय असे भासवले. श्रीमती सोनिया गांधीनी कॉग्रेस पक्षावरची आपली पकड अधिक मजबुत केली. संटासिंग आणि बंटासिंग यांनी जशी धमाल आपल्यावरच्या विनोदांनी आणली तशीच पण राजकारणात वेगळी धमाल नटवरसिंग व अर्जुनसिंग यांनी आणली. विकतच दुखण या उक्तीची दोन उदाहरणे म्हणजे आपले हे दोन आदरणीय मंत्री. त्यातही कहर म्हणजे श्री. अर्जुनसिंग आपण 'हयुमन रिसोर्स डेव्हलपमेंट' मंत्री आहोत कि 'हयुमन रिसोर्स डिसस्ट्रकशन' मंत्री असा प्रश्न त्यांनी स्वत:ला विचारायला हवा. सत्तारूढ आघाडीने अमेरिकेबरोबर एक यशस्वी असा अणूकरार करून दाखवून आंतरराष्ट्रीय राजकारणाचीही आपणांस जाण आहे हे सिध्द केले.
तसे पहाता दिल्लीचे रातकारण अवैध्य बांधकामांची पाडापाड, ऑफिस ऑफ प्रोफिट, अमरसिहांचे फोन टॅपिंग प्रकरण व त्यांनी सत्तारूढ काँग्रेस पक्षावर केलेल्या कथित शेरेबाजीमुळे गाजले. लालुंनी रेल्वेमंत्रीपद भूषवताच पहिल्याचवर्षी रेल्वेची घडी 'फायद्यात बसवली'.
''जबतक समोसेमे रहेगा आलू, पॉलिटिक्स में रहेगा लालू'' या त्याच्या वक्तव्याची खिल्ली उडवणा-या सर्वांचीच बोलती बंद केली. आता थोडासा प्रकाश प्रांतवार राजकारणावर. तामिळनाडूतला सत्तापालट, डाव्यांचा बंगालमध्ये पुन्हा विजय, केरळात पुन्हा डाव्यांची सत्ता, नितीशकुमार बिहारचे मुख्यमंत्री होणे या घटनांचा विशेष उल्लेख करावा लागेल. महाराष्ट्राचे राजकारण फाटाफुटी, कुरघोडी यांनी चांगलेच गाजले. महाराष्ट्रात विरोधी पक्ष अधिक कमकुवत बनला. राज यांच्या शिवसेना सोडून जाण्याने शिवसेनेत प्रचंड उलथापालथ झाली. महाराष्ट्रात आत्महत्येच्या अनेक प्रकरणांनी सत्तरूढ आघाडीस विरोधकांनी जेरीस आणले. खैरलांजी येथे घडलेले माणूसकीला काळीमा लावणारे प्रकरण घडताच महाराष्ट्राचे राजकारण पुन्हा पेटून उठले.आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या, पोलिस निलंबीत झाले पण......मुबंईच्या बॉम्बस्फोटांच्या बाबतीतही काय बोलणार? आरोपी शोधलेत पण....प्रत्येकवेळेला धडाडीचा फायदा घ्यायचा व त्यांच्या पाठीवर कौतुकाची पाठ थोपटायची...वा काय शहर आहे? कधी थांबतच नाही अस म्हणायचं आणि मागच सगळ विसरून जायला मुबंईकरांना भाग पाडायच हाच डाव यावेळी पण खेळला गेला नाही म्हणजे नशीब म्हणायच इतकच.
चित्रपटसृष्टी व मराठी नाटयसृष्टी
यंदा बरेच मोठया बॅनरचे हिंदी चित्रपट तिकीट पाटीवर झळकले. थोडयाच हिंदी चित्रपटांना यश लाभले. त्यात व्यावहारीक दृष्टया किंवा आर्थिकदृष्टया फायदयाच विचार करता आमीरचा 'रंग दे बसंती' आणि संजय व अर्शदचा 'लगे रहो मुन्नाभाई' यांचा विशेष उल्लेख करावा लागेल. ऋतिकच्या 'क्रिश' चित्रपटाने तगडी कमाई केली. थोडासा वेगळा विषय घेऊन आलेला 'खोसला का घोसला' हा खूप लोकांना आवडला. मराठी चित्रपटसृष्टीत यंदा आशादायक 'चित्र' दिसलेच नाही. मराठी नाटयसृष्टीतही आयाराम गयाराम नाटके वाढली काही नविन संस्था वेगवेगळया विषयावरील नाटके घेऊन प्रेक्षकांच्या समोर गेल्या, पण प्रेक्षकांनी त्यांच्या नाटकांकडे पाठ फिरवली. कौतुक करायला हवे ती श्री. अशोक हांडे यांचे. त्यांनी मराठी बाणा हा कार्यक्रम प्रेक्षकांच्यापुढे १२५ कलाकारांच्या संचात अतिशय उत्कृष्ठपणे सादर केला. मराठी प्रेक्षकांनीही या कार्यक्रमाला भरभरून दाद दिली. यंदा तश्या बरंच मराठी चित्रपटांची घोषणा निर्मात्यांनी केली आहे. त्यांना त्यांच्या चित्रपटासाठी माझ्याकडून शुभेच्छा.
भारताच्या खेळा विषयी
भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकी....त्या खेळातील भारताची अधोगती पाहून 'के.पी.एस गील' यांना 'गुल' करायची वेळ आली आहे असे नक्कीच वाटते. यंदाचे वर्ष गाजवले ते क्रिकेट व इतर खेळांनी. त्यामध्ये बॅडमिंटन आणि बुध्दीबळ या दोन खेळांची नावे घ्यावी लागतील. शुटींग या स्पर्धा प्रकाराचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. 'सायना नेहगल' या महिला खेळाडून फोर स्टार असलेली बॅडमिंटनची ग्रँडपिक्स स्पर्धा जिंकली आणि जागतिक बँडमिंटन स्पर्धेत (ज्युनिअर गट) अंतिम सामन्यात पोहचण्याची कामगिरी केली. 'परिमार्जन नेगी' या १३ वर्षांच्या लहानग्या मुलाने 'विश्वनाथन आनंद' व 'पी हरिकृष्णा' यांच्यापेक्षाही लवकर ग्रॅण्डमास्टर होण्याचा किताब मिळविला. अशी कामगिरी करणारा तो पहिलाच भारतीय. यंदा भारताच्या एशियामध्ये गेलेल्या विविध स्पर्धांमध्ये भाग घेणा-या संघांनी चांगलीच कामगिरी केली. त्यात पेस व भूपतीचे दुहेरी मधील सुवर्णपदक व ४ x ४०० मिटर रिले स्पर्धेत महिलांच्या संघाने मिळविलेले सुवर्णपदक व भारताच्या महिला हॉकी संघाने मिळविलेल्या ब्रॉन्झ पदकाचा विशेष उल्लेख करावा लागेल. आपल्या शुटींग संघानेही एशियाडमध्ये चांगली कामगिरी केली. अरे मी तर क्रिकेटबद्दल बोललो नाही....कारण बोलण्यासारखे काही राहिलय का? यंदा गोल्फसारख्या खेळातही जीव मिल्खासिंग याने चार स्पर्धा जिंकून भारताची मान उंचावली आहे. एकंदरीतच काय तर हॉकी आणि क्रिकेट हे दोन खेळ वगळता इतर ब-याच खेळांमध्ये २००६ मध्ये भारतीयांनी चमक दाखविली.
भारतातील उद्योगधंदे
हे वर्ष तसे उद्योगधंदयाना फलदायी ठरले. सेनसेक्सने १०००० चा आकडाही गाठला. भारताच्या जीडीपी मध्ये ९.५ टक्कयांनी वाढ झाली. टाटा आणि व्हिडीओकॉन या भारतीय कंपन्यानी देशाबाहेरील काही कंपन्यावर आपला हक्क मिळवला. मित्तल स्टील कंपनीचे सर्वेसर्वा लक्ष्मी मित्तल यांनी 'अर्सेलर' या युरोपातील सर्वात मोठया स्टील कंपनीत आपली भागीदारी नोंदवली. तब्बल १.४४ लाख कोटी रूपयांचा हा व्यवहार होता. टाटा कंपनीनेही 'कोरस' या कंपनीबरोबर डिल केले तर विप्रो कंपनीनेही अमेरिकेतील तीन कंपन्या खरेदी केल्या. तर रॅनबॅक्सी कंपनीनेही रूमेनियातील एक कंपनी खरेदी केली. भारताचे वाणिज्य मंत्री श्री. कमलनाथ यांचा हसरा चेहरा भारताच्या प्रगतीची साक्ष देत असायचा.
यावर्षी भारताच्या काही प्रसिध्द व्यक्तींनी उच्चारलेल्या या वाक्यांनी जरा मजा आणली.
 |
मी मला अजुनही पूर्णत्वाने एक शिक्षकच/प्राध्यापक समजतो. केवळ अपघातानेच मी राजकारणात खेचला गेलो. पंतप्रधान श्री. मनमोहन सिंग. |
 |
माझी पंतप्रधान श्री. मनमोहन सिंग यांच्याबद्दल एकच तक्रार आहे कि ते आपण केलेली कामगिरी प्रकर्षाने सर्वांसमोर आणत नाहीत. श्रीमती सोनिया गांधी पंतप्रधानाबददल गौरवोदगार काढतांना. |
 |
माझी राजकारणात शिरण्याची कदापीही इच्छा नाही कारण जीवनात काही गोष्टींना मानतो.... आय बिलिव्ह इन सरटन व्ह्यालूऐशन.- श्री. नारायण मूर्ती राजकारणात प्रवेश करणार का या प्रश्नाला उत्तर देतांना. |
 |
पेप्सीकोला जर भारतात बंद झाला तर मी तो यु.एस.ला जाऊन विकत घेईन. शाहरूख खान, पेप्सी बंदीवर बोलतांना. |
 |
मला पुन्हा लिएंडर पेस बरोबर खेळण्याची इच्छा नाही कारण त्याने माझ्या देशाबद्दलच्या कमिटमेंट बाबत प्रश्न उपस्थित केला होता. महेश भूपती, यंदा एशियाडचे दुहेरीचे पदक मिळाल्यावर. |
 |
जयललीता यांनी आता विश्रांती घ्यावी......स्वत:साठी नाही तर लोकांसाठी तरी श्री. करूणानिधी तामिळनाडू विधानसभा निवडणूकीत विजयी झाल्यावर. |
 |
माझं वय कदाचित असेल साठ, बासष्ठ किंवा पासष्ठ. माझी जन्मतारीख ठाऊकच नाही. श्री. लालूप्रसाद यादव, आपल्या वाढदिवसाच्या दिवशी |
२००६ सालात श्री. प्रमोद महाजन, श्री. पॉली उम्रीगर, श्रीमती नादिरा, श्री. काशीराम, श्री. ऋषिकेश मुखर्जी, श्री. बिसमिल्ला खान, कन्नड चित्रपट अभिनते श्री. राजकुमार, श्री. नौशाद अली, श्री. मनोहर श्याम जोशी या प्रभूतींना देवाज्ञा झाली.
तर अस सरळ २००६........... सेनसेक्सला १०००० चा उच्चांक गाठून देणार, भारतात कोणालाही कुठूनही एक रूपयात फोन करायची सोय मिळवून देणारं, वंन्दे मातरम यावरून राजकारण करायला लावणारं, मुन्नाभाई मुळे लोकांना गांधीगिरी करण्यास प्रवृत्त करणारं, टाटांच्या 'स्मॉल' कारच्या निमित्ताने ममता बॅनर्जीना 'बिग' प्रसिध्दी देणारं, मुंबईला पुन्हा बॉम्बस्फोट बघायला लावणारं, चिकन गुनियामुळे महाराष्ट्र सरकारच्या पायाखालची जमिन सरकवनारं, श्रीमती इंदिरा नोयी या भारतीय स्त्रीला पेप्सी कंपनीच सी.ई.ओ. बनवणारं, 'बुधीया' या आसाम राज्यातील चार वर्षाच्या चिमुरडयाला ६५ कि.मी. धावायला लावणारं, 'प्रिन्स' नावाच्या ५५ फुट खोल विहीरीत पडलेल्या सहा वर्षाच्या मुलाला सुखरूप पुन्हा जमिनीवर आणण्याचे यश मिळविणारं, पंच डेरल हेअर यांना मॅच ब्रेकर बनवणारं, अँजलीना जोली व ब्रेड पिट यांच्या पुणा भेटीने तिथे काय उणे ही उक्ती पुन्हा पुणेकरांना अभिमानाने म्हणायला लावणारं, ऑस्ट्रेलियन शिकारी स्टिव्ह आर्याविन याच्या मृत्युला स्ट्रिगर मासा कारणीभूत ठरणारं, सुनिता विल्यमस् या भारतीय वंशाच्या स्त्रीला अवकाशात जाणारी दुसरी भारतीय स्त्री ठरवणारं, हॉकी या नॅशनल गेमला नॅशनल शेम ठरवणारं.
कसं वाटल तुम्हाला २००६....काहीनी २००६ ला संमिश्र घटनांचे वर्ष म्हटल तर काही या वर्षाला मध्यमवर्गीय लोकांच चकाकत वर्ष म्हटल.
तुम्हाला काय वाटत? असो.
येणार २००७ साल तुम्हाला टकाटक आणि चकाचक जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.........
२००७ में बोले तो टेन्शन में नही रहनेका, मजेमे जिनेका आपुन चला.
मंदार माईणकर.
|