सोमवारची [ शिवामुठीची ] कहाणी

somvar shivamuth kahani आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. त्या राजाला चार सुना होत्या. तीन आवडत्या होत्या, एक नावडती होती. आवडत्या सुनांचा तो चांगला प्रतिपाळ करी. नावडतीला जेवायला उष्टं, नेसायला जाडंभरडं. राहायला गुरांचं बेडं दिलं. गुराख्याचं काम दिलं. पुढं श्रावणमास आला. पहिला सोमवार आला. ही रानीं गेली. नागकन्या-देवकन्यांची भेट झाली. त्यांना विचारलं, “बाई बाई, कुठं जातां?” “महादेवाच्या देवळीं जातों, शिवामूठ वाहतों.” “यानं काय होतं?” “भ्रताराची भक्ति होते. इच्छित कार्य सिद्धीस जातं. मुलंबाळं होतात. नावडतीं माणसं आवडतीं होतात. वडील मनुष्यांपासून सुखप्राप्ति होते.” मग त्यानीं हिला विचारलं, “तूं कोणाची कोण?” “मी राजाची सून, तुमच्याबरोबर येते.” त्यांचेबरोबर देवळांत गेली. नागकन्या-देवकन्या वसा वसू लागल्या. नावडती म्हणाली, “काय ग बायांनो वसा वसतां?” “आम्ही शिवामुठीचा वसा वसतों.” “त्या वशाला काय करावं?” “मूठ चिमुट तांदुळ घ्यावे, शिवराई सुपारी घ्यावी, गंध फूल घ्यावं, दोन बेलाचीं पानं घ्यावीं. मनोभावे पूजा करावी. हाती तांदूळ घ्यावे आणि तोंडानं “शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा. सासूसासर्‍या, दिराभावा, नणंदाजावा, भ्रतारा, नावडती आहे ती आवडती कर रे देवा.” असं म्हणून तांदूळ वहावेत. संध्याकाळपर्यंत उपवास करावा. उष्टंमाष्टं खाऊं नये. दिवसा निजूं नये. उपास नाहीं निभवला तर दूध प्यावं. संध्याकाळीं आंघोळ करावी. देवाला बेल वहावा आणि मुकाट्यानं जेवण करावं. हा वसा पाच वर्ष करावा. पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसर्‍यास तीळ, तिसर्‍यास मूग, चवथ्यास जव आणि पाचवा आला तर सातू शिवामूठीकरितां घेत जावे.”

पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या-देवकन्यांनीं दिलं आणि दुस-या सोमवारी हिला घरून आणायला संगितलं. त्या दिवशीं हिनं मनोभावं पूजा केली. सारा दिवस उपास केला. जावानणंदांनी उष्टंमाष्टं पान दिलं. ते तिनं गाईला घातलं. शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिली.

पुढं दुसरा सोमवार आला. नावडतीनं घरांतून सर्व सामान मागून घेतलं. पुढं रानांत जाऊन नागकन्यांबरोबर मनोभावें पूजा केली आणि “शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा. सासूसासर्‍या , दिराभावा, नणंदाजावा, भ्रतारा नावडती आहें ती आवडती कर रे देवा.” असं म्हणून तीळ वाहिले. सारा दिवस उपवास केला. शंकराला बेल वाहिला. दूध पिऊन निजून राहिली. संध्याकाळीं सास-यानं विचारलं. “तुझा देव कुठं आहे? नावडतीनं जबाब दिला, “माझा देव फार लांब आहे. वाटा कठीण आहेत, काटेकुटे आहेत. साप-वाघ आहेत, तिथं माझा देव आहे.”

पुढं तिसरा सोमवार आला. पूजेचं सामान घेतलं. देवाला जाऊ लागली. घरची माणसं मागं चाललीं. “नावडते, तुझा देव दाखव,” म्हणून म्हणूं लागलीं. नावडतीला रोजचा सराव होता. तिला कांही वाटलं नाहीं. ह्यांना काटेकुटे पुष्कळ लागले. नावडतीची दया आली. आजपर्यंत रानांत
कशी येत असेल कोण जाणे. नावडतीला चिंता पडली. देवाची प्रार्थना केली. देवाला तिची करुणा आली. नागकन्या, देवकन्या ह्यांसह वर्तमान देऊळ सुवर्णाचं झालं. रत्नजडिताचे खांब झाले, स्वयंभू महादेवाची पिंडी झाली. सगळ्यांनीं देवाचं दर्शन घेतलं.

नावडाती पूजा करूं लागली. गंधफूल वाहू लागली. नंतर मूग घेऊन “शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा. सासूसासर्‍या , दिराभावा, नणंदाजावा, भ्रतारा, नावडती आहें ती आवडती कर रे देवा.” असं म्हणून शिवाला वाहिलें. राजाला मोठा आनंद झाला. नावडतीवर प्रेम वाढलं. दागिने ल्यायला दिले. खुंटीवर पागोटं ठेवून तळं पहायला गेला. नावडतीची पूजा झाली.

पूजा झाल्यावर सगळीं माणसं बाहेर आलीं. इकडे देऊळ अदृश्य झालं. राजा परत आला. माझं पागोटं देवळीं राहिलं देवळाकडे आणायला गेला. तो तिथं एक लहान देऊळ आहे, तिथं एक पिंडी आहे. वर आपण केलेली पूजा आहे, जवळ खुंटीवर पागोटं आहे. तेव्हां त्यांने सुनेला विचारलं, “हे असं कसं झालं?” “माझा गरिबाचा हाच देव. मीं देवाची प्रार्थना केली, त्यानं तुम्हाला दर्शन दिलं.” सुनेमुळं देव भेटला म्हणून तिला पालखींत घालून घरीं आणलं. नावडती होती ती आवडती झाली.

जसा तिला शंकर प्रसन्न झाला, तसा तुम्हां आम्हां होवो. ही साठां उत्तरांची कहाणी. पांचां उत्तरी सुफळ संपूर्ण.

सोमवारची [ फसकीची ] कहाणी

somvar kahani ऐका महादेवा, तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. त्यांत एक गरीब सवाष्ण बाई रहात असे. तिनं आपलं श्रावणास आला म्हणजे काय करावं ? आपलं दर सोमवारीं पहाटेस उठावं, स्नान करावं, पूजा घ्यावी, एक उपडा, दुसरा उताणा, पसाभर तांदूळ घ्यावे व महादेवाच्या देवळीं जाऊन मनोभावें पूजा करावी. नंतर प्रार्थनेच्या वेळीं, ‘जय महादेवा, घे फसकी व दे लक्ष्मी’ असं म्हणून महादेवाच्या मस्तकीं तांदूळ अर्पण करावे. उरले तांदूळ नंदीच्या पाठीवर वाहून आपण घरी यावं. असं चारी सोमवारीं तिनं केलं. शंकर तिला प्रसन्न झाला. दिवसेंदिवस ती श्रीमंत झाली. मनामध्ये समाधान पावली. पुढं उद्यापनाचे वेळीं तिनं देवी अन्नपूर्णेला गजनीची चोळी पाठवली, काशीविश्वेश्वराला रुपया पाठवला आणि व्रताची समाप्ति केली. शंकरांनीं तिला निरोप पाठविला . “अजून तुला, नंदीच्या सेवेचं फळ मिळालं नाहीं, माझ्या सेवेचं तर अद्याप देणंच आहे.” पुढं शंकरांनीं तिला अपार देणं दिलं. तर जसा तिला विश्वेश्वर प्रसन्न झाला, तसा तुम्हां आम्हां होवो. ही साठां उत्तरांची कहाणी पांचा उत्तरीं सुफळ संपूर्ण.