संस्कृती

मराठी संत

मराठी संत

संत मुक्ताबाई

sant-muktabai महाराष्ट्रात अनेक संत होऊन गेले त्यात पुरुष बरोबरीने महिला संतांनीही समाज प्रबोधनात खूप मोठा हातभार लावलेला आहे. संत मुक्ताबाई यांचा उल्लेख त्यात करावाच लागेल. संत मुक्ताबाई या महाराष्ट्रातील संत-कवयित्री होत्या. संत निवृत्तिनाथ, संत ज्ञानेश्वर व संत सोपानदेव हे त्यांचे थोरले भाऊ होते.

संत मुक्ताबाई ह्या संत ज्ञानेश्वरांच्या धाकट्या बहीण म्हणून सर्वांना परिचित आहेत. परंतु त्यांचे स्वतःचेही स्वतंत्र व्यक्तीमत्व होते. त्यांनी रचिलेले ताटीचे अभंग हे त्यांच्या नावावर नोंदविलेले आहेत. या अभंगांमध्ये त्यांनी संत ज्ञानेश्वरांना काही बोध दिला आहे. त्या योगी चांगदेवांच्या गुरू होत्या. त्यांनी ज्ञानबोध या ग्रंथाचेही लेखन केले आहे असे संशोधनांती स्पष्ट होते. ह्या ग्रंथामध्ये संत निवृत्तीनाथ आणि संत मुक्ताबाई ह्यांचा संवाद आलेला आहे. त्या समाधिस्थ होण्याच्या थोडेसे आधी झालेले हे लिखाण असावे, असे त्यातील अंतर्गत संदर्भांवरून लक्षात येते.

त्यांचा जन्म शके ११९९ किंवा शके १२०१ मध्ये आश्विन शुद्ध प्रतिपदेला (घटस्थापना) झाला असा उल्लेख आहे. ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा, मातापित्यांचा देहत्याग, ज्ञानेश्वरांनी मुक्ताबाईस दिलेली सनद, विसोबा खेचर यांचे शरण येणे हे त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचे प्रसंग. शुद्धिपत्र मिळविण्यासाठी चौघे भावडं पैठण गावी आले. “ताटी उघडा ज्ञानेश्वरा” अशी आर्जव मुक्ताईने ज्ञानेश्वरांना केली होती. ज्ञानेश्वरांकडून ज्ञानेश्वरीची निर्मिती करण्यातही मुक्ताबाईचा मोलाचा वाटा आहे. मुक्ताबाईने चांगदेवाना ‘पासष्टी’चा अर्थ सांगितला. त्यानंतर चांगदेव महाराज मुक्ताबाईचे पहिले शिष्य झाले. मुक्ताबाईंवर गोरक्षनाथांच्या कृपेचाही वर्षाव झाला होता. त्यानंतर मुक्ताबाईला अमृत संजीवनीची प्राप्ती झाली.

मुक्ताबाई यांची अभंग निर्मितीही अतिशय अर्थपूर्ण आणि समाजाभिमुख आहे. त्यांच्या अभंगातून सर्वांच्या जीवनाच्या अनुषंगाने उल्लेख आढळतो. अशा या संत मुक्ताबाईस विनम्र अभिवादन.