मसूर येथे १ (स्थापना शके १५६७)


समर्थ स्थापीत ११ मारुती

Shahapur Maruti समर्थांच्या भ्रमणामुळे, त्यांच्या रसाळ कीर्तनांमुळे आणि त्यांच्या सिध्दि सामर्थ्यामुळे त्यांचा शिष्यसंप्रदाय वाढत चालला. आपल्या शिष्यांना व आपल्याकडे आकर्षित होणा-या लोकांना एकत्र आणून त्यांच्यांत परस्परांविषयी आत्मीयता निर्माण व्हावी म्हणून त्यांनी रामजन्माचे व हनुमानजयंतीचे उत्सव सुरू केले. अशा उत्सवांसाठी त्यांनी काही मोक्याच्या ठिकाणी मारूतीची स्थापना केली त्यातील एक मसूरचा मारूती होय. मसूर येथील ब्रम्हापुरी भागातील कुलकर्णी घराण्याला समर्थांनी अनुग्रह दिला होता म्हणून त्या ब्रम्हापुरी भागातच शके १५६७ मध्ये मारूतीची स्थापना केली. हा मारूती ‘मसूरचा मारूती’ म्हणून ओळखला जातो. ‘महारूद्र हनुमान’ असेही म्हणतात.

शहापुरपासून मसूर शहर फक्त दोन अडीच मैलांवर आहे. पुणे-मिरज मार्गावर मसूर रेल्वे स्टेशन आहे. गावाजवळ दोन ओढे एकत्र येतात. ब्रम्हापुरी भाग ओढयापलीकडे आहे.

ही मूर्तीसुध्दा चुन्याची आहे. मूर्तीची उंची सुमारे ५ फूट आहे. मूर्ती पूर्वाभिमुख आहे. समर्थांच्या अकरा मारूतीत सर्वात देखणी ही मूर्ती आहे. मूर्ती सुंदर रंगविलेली आहे. मूर्तीची मुद्रा सौम्य,प्रसन्न आहे, डोक्यावर सुरेख मुकुट आहे. गळयातील माळ, हार, जानवे, कटि-मेखला, लंगोटाचे काठ, हाताची बोटे ही सर्व बारकाव्याने रंगविलेली आहेत. मूर्तीच्या डाव्या उजव्या हाताला शिवाजी महाराज व समर्थ रामदास यांची चित्रे काढलेली आहेत. गाभा-याच्या एका भिंतीवर गाभाऱ्याचेच रंगीत चित्र आहे. देवळावर एका वृक्षाने सावली धरली आहे.

देवळाचा सभा मंडप सुमारे १३ फुट लांबीरूंदीचा चौरस आहे व सहा दगडी खांबांवर आधारलेले पक्के छत आहे. देवळाशेजारीच नारायण महाराजांचा मठ आहे.

आता या देवळाचा जिर्णोध्दार श्रीरामदासस्वामी संस्थान, सज्जनगड या संस्थेने केला असून देवळाची मालकी वरील संस्थेकडे आहे. देवळाची व्यवस्था प्रतीवर्षी हयाच संस्थेतर्फे केली जाते. समर्थ रामदासांनी हया मारूतीची स्थापना केल्यानंतर सतत ४ वर्षे येथे रामवनमीचा उत्सव केला. हया उत्सवांपैकी एका उत्सवात समर्थांना ‘कल्याण’ हया शिष्याची प्राप्ती झाली.

‘कल्याणा’चे मूळ नाव ‘अंबाजी’ असे होते. तो समर्थांबरोबर त्यांचा शिष्य म्हणून फिरत असे. समर्थांनी त्याची परिक्षा घ्यायचे मनात ठरविले. मसूर येथील रामनवमीच्या उत्सवाच्या मिरवणुकीत एका झाडाची एक मोठी फांदी आड येऊ लागली. समर्थांनी अंबाजीला कुऱ्हाडीने ती फांदी तोडायला सांगितली. मात्र फांदीच्या शेंडयाकडे बसून फांदी तिच्या बुंध्याकडे तोडायची अशी स्पष्ट सूचना त्याला समर्थांनी दिली व ते निघून गेले. गुरूच्या आज्ञेप्रमाणे अंबाजीने फांदी तोडली तेव्हा तो फांदीसकट तेथे खाली असलेल्या खोल विहिरीत पडला. बराच वेळ झाला तरी तो बाहेर येईना की त्याचा आवाज येईना. सर्व लोकांना काळजी वाटू लागली. समर्थांना लोकांनी हा वृत्तान्त सांगितला. तेव्हा समर्थ विहिरीजवळ आले व विहिरीत डोकावून म्हणाले, ”अंबाजी, कल्याण आहे ना?’ त्याबरोबर विहिरीतून उत्तर आले, ‘सर्व कल्याण आहे.’ अंबाजीची गुरूनिष्ठा कसोटीला उतरली. तेव्हापासून अंबाजीचे ‘कल्याण’ हेच नाव रूढ झाले.

समर्थ संप्रदायातील एक अनुयायी महाराज ‘रामदासी’ मसूर येथे आले असता त्यांना मारूतीरायांनी ‘येथेच राहा’ असा आदेश दिला. त्याप्रमाणे ते येथेच राहिले व त्यांनी देवळाची दुरूस्ती करवून घेतली व उत्सवाची शिस्त व पध्दती ठरवून दिली. येथे चैत्र शु. १५ ला हनुमानजयंतीचा उत्सव होतो. येथील रामदासी महाराजांच्या मठीत काही यात्रेकरूंची उतरण्याची सोय होऊ शकते. भोजनाची मात्र खास अशी सोय नाही.

संदर्भग्रंथ – समर्थ स्थापित अकरा मारुती
(लेखक – पु. वि. हर्षे)